दिब्रुगड / गुवाहाटी – आसामातील बाघजान येथे तेल विहिरीला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन जवान मृत्युमुखी पडले, गेले पंधरा दिवस या विहिरीतून मोठ्या प्रमाणात भूगर्भ वायू बाहेर येत असून त्याच विहिरीला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे.
या कामात गुंतलेले हे अग्निशमन दलाचे जवान दोन दिवस बेपत्ता झाले होते. त्यामुळे तेथे त्यांच्या मदतीला एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्यात आल्या त्यावेळी त्यांचे मृतदेहच त्यांच्या हाती लागले. त्यांच्या शरीरावर भाजल्याच्या कोणत्याही खुणा नाहींत. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समजलेले नाही.
काही जणांच्या मते आगीत ते वेढले गेल्यानंतर त्यांनी तेथील पाण्यात उडी मारली आणि त्यात ते वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा. ही आग विझवण्याच्या कामात ओएसजीसीतील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले असता त्यांचाही एक जवान यात जखमी झाला आहे. ही आग मोठी असून ती विझवण्यासाठी किमान चार आठवड्याचा कालावधी लागू शकतो असे इंडियन ऑईलच्या सूत्रांनी सांगितले.