– अमित डोंगरे
भारताचे दोन संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त आहेत. यावर काही जण आक्षेप घेत आहेत तर काही जण बीसीसीआयचे कौतुक करत आहेत. एक संघ असताना दुसरा कशाला खेळवता हा एक आक्षेप आहे तर, एकाच वेळी दोन संघ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दर्जाचे तयार करत भारताने आगामी संपूर्ण दशकावर वर्चस्व राखण्याची वाटचाल सुरू केली आहे, असे कौतुकही होत आहे. ते काहीही असो, आता जर दोन संघ केलेच आहेत तर आयसीसीच्या आगामी सर्व स्पर्धांसाठी भारताच्या प्रमुख संघातील कर्णधार विराट कोहलीसह प्रत्येक खेळाडूला सक्षम पर्याय उपलब्ध झाला पाहिजे.
कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात सलामीपासून तळापर्यंत जे सगळे अनुभवी खेळाडू आहेत, त्यांची रिप्लेसमेंट जर दुसरा संघ देत असेल तर हरकत काय आहे. एक फायदा या गोष्टीचा होऊ शकतो. संघातील कोहलीसह प्रत्येक खेळाडू संघातील स्थान धोक्यात आल्याच्या जाणिवेने जबाबदारीने खेळेल व जर त्यात यश मिळाले तर ते संघासाठी लाभदायकच ठरणार आहे.
याउलट जर मुख्य संघातील कोणी अपयशी ठरला तर शोधाशोध करण्याची गरज नाही तर दुसऱ्या संघातील त्याच तोडीचा दुसरा खेळाडू संधी मिळवेल. पर्याय असणे संघहिताचेच ठरणार आहे, कारण येत्या काळात भारतीय संघाला एकदिवसीय आणि टी-20 विश्वकरंडक खेळायचा आहे. त्या दृष्टीने तयारीचा भाग म्हणूनच श्रीलंकेत वेगळा संघ पाठवला आहे.
या संघाने विजयी सलामी देताना श्रीलंका संघावर पूर्णपणे वर्चस्व राखले आहे. या संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड असल्याने गुणवत्ता मार खाणार नाही हा विश्वास आहेच पण केवळ मुख्य संघातील प्रत्येक खेळाडूच्या पर्यायासह मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही द्रविडच्या रूपाने सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ते अपयशी ठरले तर त्यांची जागा घेण्यासाठी द्रविड आहेच. स्पर्धा असेल तरच कामगिरी सुधारते असे म्हणतातच.
एक गोष्ट खरी आहे की, शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली संघाने जागतिक स्तरावर मक्तेदारी निर्माण केली. केवळ न्यूझीलंडकडून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याने लगेच शास्त्रींना हटवणे योग्य नाही. मात्र, जर खरेच भविष्यात शास्त्रींच्या कामगिरीत सातत्य राहिले नाही तर द्रविडच्या डोक्यावर प्रशिक्षक पदाचा हा काटेरी मुकुट चढवायला हरकत नाही, द्रविड त्या काट्यांचे रूपांतर फुलात करण्याच्या क्षमतेचा निश्चितच आहे.