सातारा – करोना संकटामुळे झालेला तोटा भरुन काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत असून गणेशोत्सवात एसटी बसेसच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी सातारा विभागाने जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणासह मुंबई, पुण्याला जाण्यासाठी दररोजच्या फेऱ्यांव्यतिरिक्त दोनशेहून अधिक जादा बसेसच्या फेऱ्या शनिवारपासून (दि. 27) सुरु होणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
करोना काळात महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाल्याने एसटी आर्थिक डबघाईला आली होती. महामंडळाला झालेला तोटा भरुन काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळाला गणेशोत्सवात चांगली संधी असल्याने बस फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवात कोकणातील चाकरमान्यांसाठी जादा 115, मुंबईसाठी 20, पुण्याला 35 यांसह राज्यभरात जाण्यासाठी बसेसची संख्या वाढवली आहे. मुंबईहून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या बसेसची संख्याही अधिक असून महाबळेश्वरला 11 व साताऱ्याला आठ बसेसचे आरक्षण फुल झाले आहे. साताऱ्याहून मुंबई व पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने त्या मार्गावर दर तीस मिनिटे व एका तासाने वाहतूक केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
करोना संकटात एसटी महामंडळाला मोठा तोटा झाला होता. यात्रा हंगाम, गणेशोत्सव, दीपावली आदी सण उत्सवांच्या हंगामात जादा बसेसची व्यवस्था करुन प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात येत आहे. कोकण, मुंबई, पुण्यासह विविध ठिकाणी जाण्यासाठी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची संख्या विचारात घेऊन काही मार्गांवर बसेस वाढवण्याचेही नियोजन करण्यात येत आहे.
रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, सातारा