नवी दिल्ली – स्त्री व पुरुष समानता सांभाळली जावी व भारतीय पथकातील खेळाडूंमध्येही याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठीच यंदा जपानमध्ये होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक पुरुष व एक महिला असे दोन ध्वजवाहक नियुक्त केले जातील, असा खुलासा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी केला आहे. मात्र, अनेक क्रीडा संघटनांनी या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे सर्व क्रीडा प्रकारातील संघ जाहीर झाल्यानंतरच ध्वजवाहकाची निवड केली जाणार आहे. संघ निवड या महिन्याच्या अखेपर्यंत जाहीर केली जाणार आहे. अद्याप तिरंदाजी संघाला ऑलिम्पिक पात्रतेची संधी आहे. त्यामुळेच संघ निवड लांबली आहे, असे बात्रा यांनी सांगितले.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचा एकच ध्वजवाहक असायचा, पण स्त्री व पुरुष समानतेला योग्य न्याय देण्यासाठी दोन ध्वजवाहक निवडण्यात येतील. करोनामुळे उद्घाटनाचा सोहळा कसा होईल, याचा निर्णय होणे बाकी आहे. पण खेळाडूंचे पोशाख आणि अन्य तयारीला आम्ही प्राधान्य दिले आहे, असेही ते म्हणाले.