नवी दिल्ली -दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी सोमवारी केजरीवाल सरकारचे दोन निर्णय रद्दबातल ठरवले. त्यामुळे केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपालांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
दिल्लीत दिवसागणिक करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीतील रूग्णालये केवळ दिल्लीकरांसाठीच उपलब्ध असतील, असा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला. सरकारने दुसरा निर्णय घेत केवळ लक्षणे आढळणाऱ्या रूग्णांचीच करोनाविषयक चाचणी घेण्याचे ठरवले. वादग्रस्त ठरवलेले ते दोन्ही निर्णय बैजल यांनी रद्दबातल केले.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी ते पाऊल उचलले. दिल्लीचा रहिवासी असो किंवा नसो; कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकावर उपचार केला जावा. तसेच, ज्यांच्यात लक्षणे आढळत नाहीत; त्यांचीही करोनाविषयक चाचणी घेतली जावी, असे बैजल यांनी दोन आदेशांद्वारे स्पष्ट केले.
दरम्यान, बैजल यांच्या कृतीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. नायब राज्यपालांच्या आदेशांमुळे दिल्लीकरांपुढे खूप मोठी समस्या आणि मोठे आव्हान उभे राहिले आहे.
करोना महामारीच्या काळात देशभरातून आलेल्या लोकांसाठी उपचाराची व्यवस्था करणे हे खूपच मोठे आव्हान आहे. संपूर्ण देशाच्या जनतेची सेवा आम्ही करावी अशी बहुधा ईश्वराची इच्छा आहे. तसा प्रयत्न आम्ही करू, असे केजरीवाल यांनी म्हटले.