पुणे – जून सुरू झाल्याने मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सामान्य नागरिकांना अजूनही उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. मध्य महाराष्ट्रासह राज्यात बहुतांश ठिकाणी पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे संशोधक डॉ. अनूपम कश्यपी यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, “मान्सून सक्रिय होईपर्यंत पुढील दोन-तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. या पुणे आणि परिसरातही तापमानवाढ शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शुक्रवारी पुणे-36.5, लोहगाव-37.7, जळगाव-42.2, सोलापूर-41.9, नांदेड-42.4, तर अमरावती सर्वाधिक 43.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर, विदर्भातील अन्य जिल्ह्यांत 42 अंशांवरच तापमान नोंदवले गेले
सावधतेचा इशारा
एकीकडे उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला असताना पुण्यात दमट हवामानासह तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन अति हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान, अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. मोकळ्या जागेत दीर्घकाळ थांबणे धोकादायक आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.