राजगुरूनगर – खेड तालुक्यातून भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यावर मंदोशी घाटातील रस्ता गेल्यावर्षी खचला होता त्यासाठी तब्बल 2 कोटी रुपये खर्च करून भिंत व रस्ता बांधण्यात आला आहे; मात्र पहिल्याच पावसात रस्त्यात भेगा पडल्याने पुन्हा रस्ता खचण्याची मोठी भीती मंदोशी ग्रामस्थानी व्यक्ती केली आहे.
खेड तालुक्यातून भीमाशंकरला जाणारा जवळचा मार्ग मंदोशी घाटातून जातो निसर्गाच्या सानिध्यातील व धबधब्यांचा व वर्षा विहाराचा आनंद जाणाऱ्या पर्यटकांची या मार्गाला मोठी पसंती असते; मात्र मंदोशी घाटामध्ये मागील वर्षी भूस्खलन झाल्याने घाटातील रस्ता मोठ्या प्रमाणात खचला होता त्यामुळे हा मार्ग गेली 8 महिने पूर्णतः बंद होता.
या कामासाठी तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांनी मंदोशी घाटर स्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने शासनाकडे पाठपुरावा करून 1 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार यावर्षी मार्च एप्रिलमध्ये या घाट रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली होती.
उतारावर असलेल्या मंदोशी घाट पहिल्यापासून धोकेदायक आहे येथे अनेक मोठे अपघात यापूर्वी झाले आहेत. यावेळी नवीन काम करताना गटारे काढली आहेत मात्र ती काही ठराविक अंतरावर काढल्याने पावसाचे पाणी पुन्हा रस्त्यावर येत आहे. पहिल्याच पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने ते या भेगांमध्ये झिरपल्याने पुन्हा भूस्खलन होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या रस्त्यावर येणारे पाणी वेळीच थांबवणे गरजेचे असून तसे झाले नाही तर पुन्हा धोका होणार आहे म्हणून या रस्त्यावर येणाऱ्या पाण्याची बांधकाम विभागाने विल्हेवाट लावण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.
पहिल्याच पावसाचे पाणी रस्त्यात मुरल्याने मोठ्या आकाराच्या भेगा(चिरा) पडल्याने हा रस्ता खचण्याची भीती आहे त्यामुळे मोठे अपघात घडण्याची भीती आहे.संबंधित विभागाने पाणी प्रवाह बाजूला काढल्यास रस्ता खचण्यापासून वाचेल.
– दत्ता तिटकारे, स्थानिक ग्रामस्थ