नवी दिल्ली – गेल्या सुमारे दोन वर्षात देशातील कोविडच्या तीन लाटांमुळे पर्यटन उद्योगाशी निगडित व्यवसायांमध्ये सुमारे 21.5 दशलक्ष लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी सोमवारी संसदेत दिली.
लोकसभेत केलेल्या निवेदनात पर्यटन मंत्र्यांनी म्हटले आहे की या क्षेत्रातील नुकसानीच आम्ही अभ्यास केला. अभ्यासानुसार, पहिल्या लाटेत 14.5 दशलक्ष नोकऱ्या गेल्या, दुसऱ्या लाटेत 5.2 दशलक्ष नोकऱ्या गेल्या आणि तिसऱ्या लाटेत 1.8 दशलक्ष नोकऱ्या गेल्या.रेड्डी म्हणाले की, देशात हा साथीचा रोग येण्यापूर्वी 38 दशलक्ष लोक पर्यटन उद्योगात गुंतले होते.
कोरोनाच्या तीन लाटांमध्ये पर्यटन अर्थव्यवस्था लक्षणीयरीत्या घसरली होती, ज्याचा या क्षेत्राला मोठा फटका बसला. हा फटका केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील पर्यटनालाही मोठा फटका बसला आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
या क्षेत्राला मदत करण्यासाठी,या क्षेत्रातील व्यावसायिकांना व्याज मुक्त कर्ज देण्याची व्यवस्था सरकारने केली आहे असे ते म्हणाले. राज्य सरकारांनीही पर्यटन कंपन्या आणि संस्थांना जमेल तेवढी मदत केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पहिल्या पाच लाख पर्यटकांचे व्हिसा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.ते म्हणाले की, कोविड-19 साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यानंतर, 7 मार्च 2022 पर्यंत, भारताकडून 51,960 नियमित व्हिसा देण्यात आले.