लोणावळा -लोणावळा रेल्वे स्थानकात सोमवारी (दि. 27) सकाळी इंदोर-दौंड एक्सप्रेसचे दोन डबे घसरले. खंडाळा घाट चढून वर येत रेल्वे स्थानकात शिरताच दोन डबे रुळावरुन घसरले. इंदोर-दौंड एक्सप्रेस रेल्वेगाडीला लावलेले बॅकर इंजिन आणि मुख्य इंजिन यांच्यातील ताळमेळ बिघडल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली.
सोमवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास इंदोर-दौंड एक्सप्रेस खंडाळा घाट चढून वर येत असताना अधिकची शक्ती मिळावी यासाठी गाडीला मागील बाजूने पुढे ढकलण्यासाठी बॅकर इंजिन बसविण्यात येतात. तशी व्यवस्था इंदोर-दौंड रेल्वेगाडीलाही करण्यात आली होती. ही गाडी लोणावळा स्थानकात शिरत असताना पुढील मुख्य इंजिन आणि मागील इंजिन यांच्यातील ताळमेळ बिघडला आणि हा अपघात झाला.
या अपघातात इंदोर-दौंड एक्सप्रेसचे मागील दोन डबे डी 3 आणि डी 4 हे दोन डबे रेल्वे रुळावरून उतरले. मात्र यात रेल्वे रुळाचा काही भाग तुटला असल्याने हे दोन्ही डबे पुन्हा रुळावर घेत असतानाच या तुटलेला रेल्वे रूळ देखील बदलण्याचे काम रेल्वे प्रशासनाला करावे लागणार आहे. या अपघात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी पुण्याच्या दिशेने जाणारी डाऊन लाइन काही काळ रेल्वे वाहतुकीसाठी बंद करावी लागली. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू करीत इंदोर-दौंड एक्सप्रेसचे दोन डबे वेगळे करून उर्वरित ट्रेन पुढे रवाना केली.
तर मिडल लाइन आणि उपलाइनने उर्वरित रेल्वे सेवा सुरू ठेवली. या दरम्यान सकाळी 8.20 वाजता लोणावळ्यातून पुण्याकडे सुटणारी लोकल वगळता सर्व रेल्वे वाहतूक थोड्या विलंबाने मात्र सुरळीत सुरू होती. रेल्वेगाडी लोणावळा रेल्वे स्थानकात येताना हा प्रकार घडला असल्याने तात्काळ यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. दुपारपर्यंत घसरलेले डबे रुळावर घेत पुढे पाठविण्यात आले, तसेच तुटलेला रूळ बदलून डाऊन लाइनची रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.