पिंपरी (प्रतिनिधी) – लॉकडाऊनपूर्वी गावी गेलेल्या निगडीतील दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी या गावात शुक्रवारी (दि. 15) दुपारी घडली.
हर्षद शामराव भगत (वय 12) व सिद्धार्थ शामराव भगत (वय 9) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. ते यमुनानगर येथील माता अमृतामयी शाळेत शिकण्यास होते. तर शामराव भगत हे रिक्षाचालक आहेत. भगत यांचे जवळचे नातेवाईक आजारी असल्याने सर्व कुटुंबीय माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी या गावी गेले होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन झाल्यामुळे ते गावीच अडकून पडले होते.
मुले पोहायला शिकण्यासाठी आपल्या पालकांसह शेततळ्यावर जात होते. शुक्रवारी दुपारीही मुलांनी पोहण्याचा हट्ट केला. मात्र घरात काम असल्याने आपण थोड्या वेळाने जाऊ असे त्यांच्या वडिलांनी सांगितले. मात्र आम्ही पुढे जातो, तुम्ही मागून या, असे वडिलांना सांगून हर्षद आणि सिद्धार्थ आपल्या लहान चुलतभावाला घेऊन शेततळ्यावर गेले.
तिथे खेळत असताना एका भावाचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा भाऊ गेला असता तो देखील पाण्यात बुडू लागला. लहान चुलत भावाने धावत घरी जाऊन घडलेली हकीगत घरी सांगितली. त्यामुळे घरातील सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेतली. बुडालेल्या सिद्धार्थ आणि हर्षद यांना पाण्याबाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. ओटास्कीम परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.