नवी दिल्ली – लाचखोरीत गुंतलेल्या आपल्याच दोन अधिकाऱ्यांना अटक करण्याची वेळ सीबीआयवर आली. आर.के.ऋषी आणि कपिल धांकड अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. ऋषी उपअधीक्षक, तर धांकड निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत.
तब्बल 4 हजार 300 कोटी रूपयांच्या बॅंक घोटाळ्यांवरून काही कंपन्या सीबीआयच्या रडारवर आल्या आहेत. त्या कंपन्यांच्या विरोधातील तपासात तडजोड करण्यासाठी लाच घेतल्याचा ऋषी आणि धांकड यांच्यावर आरोप आहे. त्यावरून सीबीआयने याआधीच त्यांच्यासह काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
अटकेनंतर दोन्ही अधिकाऱ्यांना विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली. लाचखोरीचा आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांशी संबंधित विविध ठिकाणांवर सीबीआयने छापेही टाकले.