जुन्नर : शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवनेरवाडी (कुसुर) येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातील दोन वासरांवर बिबट्याने मंगळवारी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही वासरे ठार झाली असून वनविभागाने पंचनामा केला आहे. एकाच दिवसात या गोठ्यात दोन वेळा बिबट्याने हल्ला केला आहे. तर सहा महिन्यांची कालवड सायंकाळी ६ च्या सुमारास झालेल्या हल्ल्यात ठार झाल्याचे शेतकरी समीर हुंडारे यांनी सांगितले.
किल्ले शिवनेरीच्या या परिसरात काही दिवसांपूर्वी मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला होता. दत्तमंदिर, शिवनेरवाडी, कुसुर, सोमतवाडी व परिसरात बिबट्या नित्यनियमाने दर्शन देत असून आधीच करोनामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. उन्हाळ्याच्या हंगामात गडावर जर बिबट्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय झाली तर पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीमध्ये ते येणार नाहीत, असे हुंडारे यांनी सांगितले.
तसेच दरवर्षी गडावर होणाऱ्या वृक्षलागवडीनंतर त्यांच्या संगोपणाकडे अधिक लक्ष दिल्यास दाट जंगल निर्माण होऊन प्राण्यांना त्यांचे खाद्य गडावरच उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान या परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने पिंजरा लावला आहे.