इंदोरी – गोठ्यात बांधलेल्या दोन बैलांचा थायमीठ सदृश्य पदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाला. वारंगवाडी येथे सोमवारी (दि. 27) सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पांडुरंग रखमाजी वारींगे (रा. वारंगवाडी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंगवाडी मावळ येथील शेतकरी पांडुरंग रखमाजी वारिंगे यांच्याकडे शेतीच्या कामासाठीचे दोन बैल आहेत. त्यांचे गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेत असून, शेतातील गोठ्यावर त्यांचे बैल बांधायला असतात.
नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी गोठ्यावर बैलांना चारा घालून वारिंगे हे रात्री घरी आले. सोमवारी सकाळी पुन्हा शेतावर गेले. त्यावेळी त्यांना दोन्हीही बैले बांधलेल्या अवस्थेत मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे शिपाई विठ्ठल काळे आणि त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
तळेगाव दाभाडे पशुधन विकास अधिकारी डॉ. रूपाली दडके व वडगाव मावळ येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. अजय सुपे यांनी बैलांचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात दोन्ही बैलांच्या पोटात थायमीठ सदृश्य विषारी पदार्थ आढळून आल्याचे डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे.
शवविच्छेदन अहवालात निघालेल्या विषारी द्रव्याचे नमूने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे डॉ. दडके यांनी सांगितले. दोन बैलांपैकी एका बैलाचे वय पाच आणि दुसऱ्या बैलाचे वय सात वर्ष होते.