नवी दिल्ली – दिल्लीतील दंगलीच्या बातम्या ऐकून आपल्या कुटुंबियांविषयी काळजी वाटल्याने त्यांना भेटण्यासाठी उत्तरप्रदेशातून दिल्लीच्या गोकालपुरी भागात आलेले आमिर (वय 25) आणि हाशिम (वय16) दंगेखोरांच्या तावडीत सापडून ठार झाल्याची घटना घडली आहे. त्यांचे थोरले बंधी शिराउद्दीन यांनी आपल्या दोन्ही भावांना दिल्लीत न येण्याची सुचना केली होती पण ती झुगारून हे दोघेही तिकडे निघाले व आपला जीव गमाऊन बसले आहेत.
यात ठार झालेला आमिर हा ड्रायव्हर म्हणून काम करीत होता तर त्याचा भाऊ हा बेकार होता. ते उत्तरप्रदेशातल्या गाझीयाबादचे रहिवासी आहेत. तर त्यांचा मोठा भाऊ शिराऊद्दीन हा दिल्लीच्या गोकालपुरचा रहिवासी आहे. दंगलीच्या बातम्या ऐकून या भावांनी दिल्लीतील आपल्या भावाशी संपर्क साधला व त्यांनी दिल्लीत त्याच्या मदतीला येण्याची तयारी दर्शवली. मोठ्या भावाने त्यांना दिल्लीत येण्यासाठी मनाई केली होती पण तरीही ते दिल्लीकडे येण्यासाठी निघाले आणि दंगलीत सापडले. हे दोघेही अजून घरी कसे आले नाहीत म्हणून दिल्लीतील त्यांच्या कुटुंबियांना त्यांना फोनवर रात्री दहा वाजता संपर्क केला त्यावेळी त्यांचा फोन बंद आढळून आला.
सकाळपर्यंत ते या दोघांचा फोन संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते पण तरीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ते दयालपुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. पोलिसांनी त्यांना त्यांच्या दोन्ही बेपत्ता बंधुंचे फोटा मागीतले. त्यांनी घरी जाऊन त्यांचे फोटो दाखवताच पोलिस स्टेशन मधील एका महिला अधिकाऱ्याने आपण त्यांचे मृतदेह जीटीबी हॉस्पीटल मध्ये पाहिल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचे मृतदेह अजून या कुटुंबियांच्या ताब्यात मिळालेले नाहीत. त्यांच्यावर अजून उत्तरीय तपासणी करणे बाकी आहे. उद्या ती केली जाईल आणि त्यानंतरच हे मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.