बीड – शेतीतील ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा विजेचा शाॅक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हुसेन फकीरभाई शेख आणि जाफर फकीरभाई शेख अशी मृत्यू पावलेल्या भावंडांची नावे आहेत. ही घटना पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथे शुक्रवारी रात्री घडली.
पाटोदा भागात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना रात्रीची वीज मिळते. त्यामुळे नाळवंडी येथील हुसेन शेख आणि जाफर शेख हे दोघे भाऊ शुक्रवारी रात्री शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते. शेख यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या एका शेतकऱ्याने रानडुकरांपासून पीकांच्या बचावासाठी शेताला तारेचे कुंपण केले होते. या कुपणाला वीज प्रवाह उतरला होता.
दरम्यान, पिकाला पाणी द्यायला गेलेल्या हुसेन यांचा तारेला हात लागल्याने त्यांना जोराचा शाॅक लागला. त्यांना वाचवण्यासाठी जाफर धावले मात्र, त्यांनाही शाॅक लागला. या घटनेत दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.