नवी दिल्ली – भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात बांग्लादेशने भारताचा पराभव केला. हा सामना होण्यापूर्वीच वादात सापडला होता, कारण दिल्लीतील हवेचे प्रदूषण आणि हवेची खालावलेली पातळी यांमुळे हा सामना दुसरीकडे खेळवण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. परंतु, तीव्रे विरोधानंतरही हा सामना दिल्लीतच खेळवण्यात आला. या प्रदूषणाचा बांगलादेशी खेळाडूंनाही त्रास झाल्याची माहिती आता समोर येत आहे.
दरम्यान, ३ सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश सध्या १-० ने आघाडीवर आहे. सौम्या सरकार आणि एका बांगलादेशी खेळाडूला पहिल्या सामन्यादरम्यान उलट्यांचा त्रास झाला असल्याची माहिती ESPNCricinfo या संकेतस्थळाने दिली आहे. बांगलादेशी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनीही याप्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ७ तारखेला राजकोटच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश दुसऱ्या टी-२० सामन्यात भिडणार आहेत. या सामन्यावरही पावसाचे सावट असल्यामुळे सामना होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.