खंडाळा एक्झिट जवळ तीन वाहने बंद
प्रवाशांना नाहक मनःस्ताप
लोणावळा – मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर खंडाळा घाटातील खंडाळा एक्झिट येथिल चढ व वळणावर तीन वाहने अचानक बंद पडल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती.ही घटना गुरुवारी (दि. 18) पहाटे साडेपाच वाजता खंडाळा एक्झिट येथे घडली. त्यामुळे प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागला.
“आयआरबी’ कामगारांच्या संपाचा फटका
मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गाच्या निर्मितीपासून सुरु असलेल्या आयआरबी कंपनीच्या ठेक्याची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कंपनीत याठिकाणी काम करणाऱ्या दोनशे कामगारांवर बेरोजागारी ओढावणार आहे. द्रूतगती महामार्गावर विविध विभागात काम करणाऱ्या कामगारांना येणाऱ्या नवीन ठेकेदार कंपनीत नोकरीची हमी मिळावी या मागणीसाठी आयआरबीच्या देखभाल व दुरुस्ती विभागात काम करणाऱ्या 179 कामगारांनी बुधवार (दि.15) पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या संपामुळे वाहतूक सुरळीत करण्यास विलंब व परिणाम झाल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर खंडाळा एक्झिट येथे किलोमीटर क्रमांक 42/500 येथे चढावर एक कंटेनर पहाटे साडेपाच वाजता मार्गावर अचानक बंद पडला होता. या घटनेची माहिती समजताच खंडाळा महामार्गाचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत मंडले यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी केली.
बंद पडलेला कंटेनर बाजूला करण्यासाठी पुलरला प्राचारण करण्यात आले होते. यावेळी बंद पडलेल्या कंटेनरला बाजूला करण्यासाठी गेलेला पुलरसह अन्य एक ट्रकही मार्गावर अचानक बंद पडल्याने पुण्याकडे जाणरी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यामार्गावर वाहनांच्या आठ ते नऊ किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी आठ वाजता पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली. सकाळीच तब्बल अडीच तास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.