नगर – कर्जतमधील उपकारागृहातून पळालेल्या पाच कुख्यात आरोपींपैकी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना, तर कर्जत पोलिसांनी एका आरोपीस जेरबंद केले. मात्र त्यातील दोन आरोपी अद्यापही मोकाट आहेत.
कर्जत येथील उपकारागृहाच्या कोठडी क्रमांक 4 मधून ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (रा. जवळा, ता. जामखेड), मोहन कुंडलिक भोरे (रा. कवडगाव, ता. जामखेड), अक्षय रामदास राऊत (रा. पारेवाडी, ता. जामखेड), चंद्रकांत महादेव राऊत (रा. पारेवाडी. ता. जामखेड), गंगाधर लक्ष्मण जगताप (रा.म्हाळंगी, ता. कर्जत) या पाच कुख्यात आरोपींनी कोठडीच्या छताचा प्लायवूडचा भाग कटरच्या साहाय्याने तसेच लोखंडी गज कापून पलायन केले होते. मात्र त्यातील तिघे पोलिसांनी जेरबंद केले. मात्र अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेवक राऊत हे अद्यापही फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे एक पथक त्यांच्या मागावर असल्याचे सांगण्यात आले असून, ते सूरत, इंदूर, गुजरात याठिकाणी आश्रय घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी भेट देऊन कारागृहाची पाहणी करून कर्जतमध्येच ठाण माडले होते. मात्र कर्जत पोलीस प्रशासनाला या दोन आरोपींचा विसरच पडला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.