कराड – राज्यात सर्वत्रच पूर परिस्थिती उद्भवल्याने दोन दिवस राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आले होते. परिणामी महामार्गावर परराज्यातील अनेक ट्रक व्यावसायिक अडकून पडले होते. दोन दिवस त्यांच्या जेवणाचे खूप हाल होत होते. महामार्गालगत असणारे अनेक हॉटेल व्यावसायिक या संधीचा फायदा घेत त्यांची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील काले ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी “एक भाकरी पूरग्रस्तांसाठी’ अशी साद परिसरातील गावांमधील लोकांना दिली होती. त्यांच्या या हाकेला सुमारे वीस गावातील लोक धावून आले.
वाठार ते पाचवडफाटा या दरम्यान महामार्गावर थांबलेल्या ट्रकचालकांसाठी काले येथील बालाजी भांडी सेवा केंद्र, सौरभ-शुभम मोबाईल शॉपी नवीन एसटी स्टॅंड काले, ओम मोबाईल बाजारपेठ, अमित पाटील यांचे किराणा दुकान जुने एसटी स्टॅंड याठिकाणी सर्व जेवण संकलित करण्यात आले. काले ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.