विकासकामांवर राहणार आता बारकाईने लक्ष – सातारा जावलीतही राजकीय संदर्भ बदलणार
सातारा – आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजप प्रवेशामुळे पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता कॉंटे की टक्कर पहायला मिळणार आहे. सातारा जावली पंचायत समितीवर बाबा राजेंच्या निमित्ताने भाजपचा झेंडा फडकला असून सातारा पालिकेतही मूळचे भाजपचे सहा व नगर विकास आघाडीचे बारा अशा अठरा जणांची राजकीय मोट बांधली गेली आहे. त्यामुळे सत्ताधारी सातारा विकास आघाडीवर बहुमत टिकवून चौकटीतल्या कारभाराचा प्रचंड दबाव असणार आहे. बावीस विरुध्द अठरा हा सामना खऱ्या अर्थाने रंगतदार ठरणार आहे. गेल्या दोन दशकामध्ये ग्रामपंचायत ते स्थानिक स्वराज्य संस्था या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीने आपली सत्ता कायम टिकवली आहे. मात्र गेल्या पाच वर्षात भाजपने साताऱ्याचा कोपरा न कोपरा पिंजून काढत कराड वाई महाबळेश्वर सातारा येथे आपले अस्तित्व सिद्ध केले.
कराड, वाई, महाबळेश्वर येथे भाजपचा अध्यक्ष निवडून आला. काही पंचायत समितीतही भाजपने आघाडी घेतली. पण शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाने सातारा जावली कोरेगाव व कराड उत्तर येथील समीकरणांची उलथापालथ येथील विधानसभा निवडणुका दिशा घेणार आहेत. आता साताऱ्यात बावीस विरुद्ध अठरा सदस्यांचा विरोधातला सामना रंगणार आहे. नगर विकास आघाडीचे बारा व मूळ भाजपचे बारा अशा अठरा नगरसेवकांची जवाबदारी वाढली असून सातारा विकास माघाडीच्या कारभारावर नियंत्रण ठेवणार आहेत. कानात राजकीय खुसफुस झाल्यावर दोन्ही आघाड्या मंजूर एक्सप्रेस पळवायचे मात्र आता असे होणार नाही अगदी उपसूचनेसह अनुमोदनापर्यंत सर्व आढावा तपशीलवार सभासचिवांना घ्यावा लागणार आहे.
भाजपचे गटनेते मिलिंद कदम व नगर विकास आघाडीचे पक्ष प्रतोद अमोल मोहिते असे दोन चेहरे असणार आहेत. त्यामुळे नगरविकास आघाडीचे नगरसेवक भाजपवासी झाल्याने आघाडीचा व अभ्यासू नगरसेवक पक्षप्रतोद म्हणून निवडावा लागणार आहे. शिवेंद्रराजे यांच्याशिवाय सातारा व जावली पंचायत समितीतही हे बदल प्रकर्षाने जाणवणार आहेत. सातारा पंचायत समितीत तर एकूण 18 पैकी 13 सदस्य हे त्य बाबाराजेंचे सुध्दा माहेत. सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत हे सुध्दा बाबा गटाचे आहेत.
सातारा शहरात सातारकरांनी दोन भावांमधील छुपा आणि खुला संघर्ष पाहिला आहे. मात्र हा संघर्ष आता पक्षाच्या संदर्भाने राहणार आहे. वास्तविक खासदार उदयनराजे भोसले यांचे भाजपशीच काय तर मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. छत्रपती घराण्याचे वंशज म्हणून उदयनराजेंना नेहमीच मानं मिळाला आहे. जे राजकीय जाळे उदयनराजेसाठी विणण्यात आले त्यामध्ये भाजपला यश आले नाही मात्र शिवेंद्रसिंहराजेंचा मास्टरस्ट्रोक मारून भाजपने सातारा व जावली मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी सलगी ठेऊन भाजपवासी झालेल्या अमित कदमांना राष्ट्रवादीने गळाला लावण्याचे उद्योग सुरू केले आहेत.