पुणे -मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच थंडीमुळे जिल्ह्यातील 116 गावांमधील 2 हजार 133 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 हजार 38 मेंढ्या, 86 शेळी, सहा गायींचा समावेश आहे.
पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चिखल झाला, मेंढ्यांना बसण्यासाठी कोरडी जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यातच असलेल्या गारठ्यामुळे कोल्ड शॉक’ बसल्याने या मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर रात्रभर पाऊस झाल्याने मेंढ्याच्या शरीराचे तापमान कमी होऊन न्यूमोनिया झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले,
अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या मेंढ्यामध्ये सर्वाधिक 722 जुन्नर तालुक्यातील आहेत. तर शिरूरमधील 481 मेंढ्याचा समावेश आहे.
त्याखालोखाल आंबेगावमधील 389 मेंढ्याचा मृत्यू या अवकाळीमध्ये झाला आहे. तसेच पुरंदर तालुक्यामध्ये 131 आणि मावळ तालुक्यात 109 मेंढ्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा पंचनामान्याच्या कामात व्यस्त आहे.