इटानगर – अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गुरुवारी 15 एप्रिलला देशव्यापी लॉकडाऊन समाप्त होणार असल्याचे ट्विट केले. मात्र, काही मिनिटांतच त्यांनी ते ट्विट डिलिट केले.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचे पाऊल उचलले. त्यामुळे घरांतून बाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. घराबाहेर पडता येत नसल्याने अस्वस्थ झालेले नागरिक लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा करत आहेत.
अशातच मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर खांडू यांनी बहुधा उत्साहाच्या भरात 15 एप्रिलला लॉकडाऊन समाप्त होणार असल्याचे सूतोवाच केले. नंतर काही मिनिटांतच ते ट्विट डिलिट करून खांडू यांनी स्पष्टीकरण दिले. घिसाडघाईने केलेल्या ट्विटचे खापर खांडू यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या अधिकाऱ्यावर फोडले.
लॉकडाऊनच्या कालावधीबाबतचे ट्विट हिंदीचे मर्यादित आकलन असणाऱ्या अधिकाऱ्याने केले. त्यामुळे ते हटवण्यात आले, अशी सारवासारव खांडू यांनी केली. देशातील करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो, अशाप्रकारच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे खांडू यांची कृती चर्चेचा विषय ठरली आहे.