मुंबई – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडे एकही पदवी नव्हती, त्यामुळे राजकारणात एखाद्याला पदवी लागतेच असे काही नाही असे विधान जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केले होते. त्याचा महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
तुुषार गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा तपशीलच सादर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की महात्मा गांधी यांनी मॅट्रिकच्या दोन परिक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्यातील एक परिक्षा त्यांनी ब्रिटीश मॅट्रिक्युलेशनची उत्तीर्ण केली असून त्याच्या आधीची मॅट्रिक त्यांनी गुजरातमधील अल्फ्रेड हायस्कुल मधून उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी लंडन युनिव्हर्सिटीची कायद्याची पदवीही मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी फ्रेंच आणि लॅटिन मधील दोन डिप्लोमाही उत्तीर्ण केले आहेत.
राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ग्वाल्हेर येथे आयटीएम कॉलेज मध्ये डॉ. राम मनोहर लोहिया स्मृती व्याख्यानमालेत केलेल्या बीज भाषणात बोलताना गुरूवारी महात्मा गांधी यांच्या विषयी हे विधान केले होते. महात्मा गांधी यांच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची कोणतीही पदवी नव्हती असे विधान करताना राज्यपाल सिन्हा यांनी म्हटले होते की,महात्मा गांधी हे कायद्याचे पदवीधर होते ही बाब देशातील अनेकांना माहिती आहे, पण ते असत्य आहे आणि त्यांच्याकडे केवळ हायस्कुल उत्तीर्ण असल्याचे प्रमाण पत्र होते असेही मनोज सिन्हा यांनी म्हटले होते.
त्यावर तुषार गांधी यांनी म्हटले आहे की मी जम्मू काश्मीरच्या राजभवनाच्या पत्त्यावर महात्मा गांधींचे आत्मचरित्र पाठवत आहे. त्यात स्वत: महात्माजींनी स्वत:च्या शिक्षणाविषयी माहिती दिली आहे. त्यातून राज्यपाल महोदयांना काही ज्ञान होईल असेही तुषार गांधी यांनी ट्विटरवर नमूद केले आहे. लंडन विद्यापीठाशी संलग्न असलेल्या इनर टेम्पल लॉ कॉलेज मधून महात्मा गांधींनी कायद्याची पदवी घेतली असल्याचेही तुषार गांधी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.