जुन्नर – कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार यांची उलाढाल सुमारे 1000 कोटींच्या दिशेने वाटचाल करत असून येथे येणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबई बाजाराचे दर देण्याचा प्रयत्न असल्याने ग्रामीण भागांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपला शेतमाल मार्केटमध्ये घेऊन येतात. येथे शेतकऱ्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत असून अडतदार शेतमालाचे पैसे तातडीने अदा करतात. समितीच्या बारव येथील जागेत भव्य कांदा विक्री-लिलाव गृह उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
नारायणगाव उपबाजारात या दिवसांत दररोज सुमारे एक लाख टोमॅटो क्रेटची आवक होत असून या ठिकाणी पुणे जिल्ह्याबाहेरूनही शेतकरी माल आणतात. गेली 15 वर्षांपासून या बाजारात शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने विक्री होत असून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडत किंवा दलाली द्यावी लागत नाही. यंदा बाजार समितीत मागील महिन्यांत 1 लाख 35 हजार टोमॅटो क्रेटची विक्रमी आवक झाली. धना बाजारात शेकडा 8500 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला. याठिकाणी भव्य प्रवेशद्वार, शेतीमालासाठी शीतगृह, पाण्याची व्यवस्था आदी विकासकामे प्रस्तावित आहेत. ओतूर उपबाजारात आरसीसी लिलाव व विक्रीगृहाच्या कामाला मंजुरी मिळाली असून याठिकाणी अंडरग्राऊंड वाहनतळ उभारण्यात येणार आहे तर आळेफाटा येथे भव्य डाळींब मार्केट उभारण्याचा बाजार समितीचा मानस आहे. या दोन्ही उपबाजारात मुंबई व परिसरातून खरेदीदार येत असल्याने भाजीमालाला उच्च दर व रोख रक्कम मिळत असते. बेल्हे उपबाजारात महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम विकास प्रकल्प अंतर्गत जनावर बाजारात शेड उभारण्यात आली आहे.
याठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, जनावरांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र आवार, गाडीतून चढण्या-उतरण्यासाठी रॅंप, शेतकऱ्यांसाठी शिदोरीगृह, जनावरांचा दवाखाना, बाजार आवारातील रस्ते, स्त्री-पुरुष स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
-रूपेश सुभाष कवडे, प्र. सचिव, बाजार समिती जुन्नर.