पाकच्या विदेश मंत्र्यांचा इशारा
इस्लामाबाद: भारताना झेलम, चिनाब, आणि सिंधु नद्यांचा प्रवाह अन्यत्र वळवण्याचा प्रयत्न केल्यास ती आमच्यासाठी त्यांच्याकडून झालेली प्रक्षोभक कृती ठरेल असा इशारा पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी म्हटले आहे. सिंधु पाणी वाटप कराराच्या संबंधात मंगळवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका बैठकीत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले की भारताच्या पंतप्रधानांनी एका निवडणूक प्रचार सभेत बोलताना पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचे पाणी अन्यत्र वळवण्याचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. अशा प्रकारचा कोणताही प्रयत्न पाकिस्तानकडून सहन केला जाणार नाही असे कुरेशी यांनी नमूद केले. ते म्हणाले की अशा प्रकारचा प्रयत्न झाल्यास त्याला आम्ही आमच्या क्षमतेनुसार उत्तर देऊ, आणि तो आमचा अधिकार असेल असे ते म्हणाले.