जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन : रास्तारोको आंदोलनाचा इशारा
नगर – शहर वाहतूक शाखेच्या उदासिन कारभारामुळे जड वाहने शहरात प्रवेश करत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव गमवावे लागत असून, अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करावी अशी मागणी जिल्हा पोलीस उपाधीक्षक (गृह) प्रांजली सोनवणे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी अभिमन्यू जाधव, अमिता अकोलकर, प्रा. संतोष भळगट, भावेश विराणी, सागर शिंदे, इमरान तांबटकर, ऍड. विक्रम वाडेकर, ऋषिकेश करमाळकर आदी उपस्थित होते. शहरामध्ये आतापर्यंत अवजड वाहनांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. जड वाहनांना शहरातून प्रवेश बंदी असूनही सररास जड वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत आहेत. शहर वाहतूक शाखा याकडे डोळेझाक करत असून, ह्यात यांचे काही साटे-लोटे असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील दिल्लीगेट, कोठला, स्टेट बॅंक चौक, कापड बाजार, दाळमंडई, सर्जेपुरा, पत्रकार चौक अशा अनेक भागात कायम वाहतूक कोंडी पाहण्यास मिळते. तसेच शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक सुरक्षतेचे कोणतेच काम होत नसल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर वाहने थांबा घेतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा त्रास नाहक नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने याची दखल घेवून अवजड वाहनांना बंदी घालावी अन्यथा रस्तारोको आंदोलन केले जाईल.