वाई -जिल्ह्यात वाई तालुका हळदीसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात हळदीच्या लागवडीला वेग आला असून शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे; परंतु लाखो रुपये खर्च करून पीक काढले तरी हमीभाव मिळत नसल्याने व्यापारी मालामाल होतात, असे चित्र आहे. सध्या मजूर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
हळदीच्या उत्पादन खर्चापेक्षा दर कमी असल्याने शेतकऱ्यांची परवड होते. सध्या हळदीचा दर अवघा साडेपाच हजार रुपये असल्याने बळीराजाच्या पदरी निराशा पडत आहे. शासन व बाजार समितीने हमीभाव न दिल्याने सोन्याच्या किमतीची हळद मातीमोल भावाने विकण्याची नामुष्की वाई तालुक्यातील शेतकऱ्यांवर येत आहे.
ज्या पिकावर बाजार समितीतील उलाढाल अवलंबून आहे, ते पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचे पाऊल बाजार समितीने उचललेले दिसत नाही. गेली अनेक वर्षे हळदीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. भविष्यात हळद पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्यास आश्चर्य वाटू नये. हळदीच्या उत्पादनासाठी एकरी 60 ते 65 हजार रुपये खर्च येतो. त्यामध्ये शेणखत, बियाणे, मशागत, काढणी, वरखत, औषधे, पॉलिश, मजुरी यांचा समावेश असतो.
बाजार समितीवर व्यापाऱ्यांचे वर्चस्व
बाजार समितीत व्यापारी हा बाजारपेठ व शेतकरी यांच्यातील मुख्य दुवा असून व्यापारी हवी ती बोली लावून व प्रतवारी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. बाजार समितीला व्यापाऱ्यांकडून फायदा होत असल्याने त्यांचीच मनमानी चालते. बाजार समितीचे पदाधिकारी स्वत: शेतकरी असले तरी हळदीच्या दराबाबत ते उदासीन असतात, हे दुर्दैव म्हणावे लागेल.