भाजीपालादेखील महागला : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
पिंपरी – मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तर राज्यभर करोनाचा कहर सुरू असताना त्यात महागाईची भर पडल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. भाजीपाल्यासह डाळींचा तुटवडा निर्माण झाला असून, जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात तुरडाळीने शंभरी पार केली असून, शेवगा फ्लॉवर 80 ते 100 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
हरभऱ्याच्या डाळीनंतर देशातील सर्वाधिक खप असलेल्या तुरीच्या डाळींचा भावही गगनाला भिडला आहे. मुख्य बाजारात आवक कमी झाल्याने किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे घाऊक दर हा 100 रुपये प्रति किलो पेक्षा जास्त झाला आहे. तर किरकोळ दर हा 110 ते 130 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती बदलली नाही, तर किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरवड्यात तूर डाळीची किंमत ही 25-30 टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन तूरडाळ बाजारात येईल. याशिवाय अन्य डाळींचे भावदेखील वधारले आहेत.
भाजीपाल्याचे दरदेखील वाढले आहेत. यामध्ये फ्लॉवर, शेवग्याने प्रतिकिलो दराची शंभरी गाठली आहे. काही दिवसांपूर्वी 15 ते 20 रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या कांद्याचा दर चाळीस रुपयांवर पोचला आहे. तर आजही कोथिंबीरीच्या गड्डी 50 रुपये दराने विक्री होत असल्याने सर्वसामान्यांच्या आहारातून कोथिंबीर गायब झाली आहे.
महागाईची कारणे
राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये जीवनाश्यक वस्तूंची आवक घटली आहे. डाळींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. देशात पुरेसा साठा नाही व आयातही पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे डाळींचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागेल आहेत. सप्टेंबर अखेरीस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याचा परिणाम उत्पादनावर झाला असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. यामुळे बाजारभाव झपाट्याने वाढू लागले आहेत. तर व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्याचा आरोपदेखील होत आहे.