उभारणीपासून दुरुस्ती न केल्याने दुर्घटनांची शक्यता
पाटबंधारे खात्याचा बेजबाबदार कारभार
कालव्यावरील पूल देताहेत अपघातास निमंत्रण
वाई – धोम धरणाच्या उभारणीनंतर तालुक्यासह जिल्ह्यात पाणी पोहोचविण्यासाठी कालव्यांचे जाळे निर्माण करण्यात आले. यावेळी या कालव्याच्या दुतर्फा असणाऱ्या गावांचा संपर्क तुटू नये यासाठी कालव्यांवर पूल बांधण्यात आले. मात्र, पुलांच्या बांधणीनंतर आजपर्यंत या पुलांची साधी डागडुजीही करण्यात आलेली नसल्याने पुलांची दुरवस्था झाली असून दुर्घटनांची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नुकताच मेणवली याठिकाणी कालव्यावरील पुल पडल्याने आतातरी पाटबंधारे विभागाने खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
धोम धरणाच्या उभारणीला पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. कालव्यांवरील पुलाच्या उभारणीला तेवढाच कालवधी झालेला आहे, जवळपास शंभर पुलांची उभारणी कालव्याबरोबर झालेली आहे. धोम पाटबंधारे खात्याने या दीर्घ कालावधीत साधी कालव्यावरील पुलांची व अंतर्गत साफसफाईसुध्दा केली नाही. तालुक्यातील प्रत्येक गावांची नाळ या पुलांशी जोडलेली आहे, दररोज रहदारी करण्यासाठी हे पूल एकमेव मार्ग आहेत, अतिशय गरजेचे असणाऱ्या पुलांकडे या विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने गेल्या आठवड्यातच मेणवलीजवळील कालव्यावरील पूल कोसळला आहे, अशीच अवस्था दोन्ही बाजूच्या कालव्यावरील पुलांची झालेली आहे.
पाटबंधारे खात्याने शासनाने कालव्यांच्या व पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी न दिल्याचे कारण पुढे करत कालव्यांची कामे केलेली नाहीत. अनेक वेळा टीका झाल्यानंतर धोम पाटबंधारे खात्याने धोम पासून पाचवडपर्यंत सुमारे सतरा किलोमीटर अंतर कालव्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडे-झुडपे व अंतर्गत गाळ काढण्याचे काम पूर्ण केले. परंतु कालव्यांची दुरुस्ती केली नाही. पुलांची दुरुस्ती न झाल्याने सध्या ते पूर्णपणे मोडकळीस आल्याचे चित्र वाई तालुक्यात दिसत असून हे पूल अपघातास निमंत्रण देत आहेत. पाटबंधारे खात्याने त्वरित या पुलांकडे गांभीर्याने घेवून दुरुस्ती साठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी जोर धरू पाहात आहे.