पुणे – गेल्या काही दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्प साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी धरणातून बंद जलवाहिनीतून शहरासाठी पाणी घेताना गढूळ पाणी येत आहे. हे पाणी महापालिकेकडून नागरिकांना पूर्णत: शुद्ध करून दिले जात असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, परिणामी धरणात माती मिश्रित गढूळ पाणी येत आहे. महापालिकेकडून खडकवासला धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी घेण्यात येत आहे. मात्र, धरणातून गढूळ पाणी शुद्धीकरण केंद्रात येत आहे. हे पाणी महापालिकेकडून पूर्णत: शुद्ध केले जात असून ते पिण्यासाठी योग्य आहे. मात्र, त्यानंतरही पावसाळ्याचे दिवस असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी हे पाणी उकळून, गाळून तसेच थंड करून घ्यावे, असे
आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.