गुवाहाटी : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (कॅब) विरोध करण्यासाठी ऑल आसाम स्टुडंटस् युनियन (आसू) आणि नॉर्थ इस्ट स्टुडंटस् ऑर्गनायझेशन (नेसो) यांनी पुकारलेल्या बंदमुळे आसामच्या ब्रम्हपुत्रा खोऱ्यात जनजीवन विस्कळीत झाले. महामार्गावर टायर पेटवून या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
आसू आणि नेसोने ईशान्य भारतात 11 तासांचा बंद घोषीत केला. मात्र बंगाली बहुल असणाऱ्या बराक खोऱ्यात या बंदला कमी प्रतिसाद मिळाला. शहराच्या माळीगाव भागात सरकारी बसेसवर दगडफेक करण्यता आली. खासगी स्कूटर पेटवण्यात आल्या. दुकाने, बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शैक्षणिक आणि वित्त संस्था बंद होत्या. या विधेयकाच्या निषेधार्थ गुवाहाटीत जागोजागी निदर्शने करण्यात आली.
आसाम सचिवालय आणि विधानसभेच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या निदर्शकांशी सुरक्षा दलांचा संघर्ष उडाला. आसाममधील रेल्वे सेवा विस्कळति झाली असल्याचे रेल्वे खात्याने मान्य केले आहे. कामरुप जिल्ह्यात विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे कार्यालय बंद पाडण्याचा प्रयत्न निदर्शकांनी केला. खासगी आणि सार्वजनिक वाहनेही फारशी रस्त्यावर आली नाहीत. गुवाहाटीत सरकारी एस.टी.पोलिस बंदोबस्तात काही प्रमाणात सुरू होती. बंदच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी आपल परीक्षांच्या वेळा पत्रकात बदल केला आहे.
दिब्रुगढ जिल्ह्यात ऑईल इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यापासून अडवणाऱ्या आंदोलकांचा सुरक्षा दलाशी संघर्ष उडाला. निदर्शकांनी जागोजागी टायर्स पेटवून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.विद्यार्थी रस्त्यावर उतरून हे विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी करणाऱ्या घोषणा देत होते. या बंदच्या पार्श्वभूमीवर आसाम, अरुणाचल प्रदेश, नेगालय मिझोराम आणि त्रिपुरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागालॅंडमध्ये हॉर्नबिल फेस्टीव्हल सुरू असल्याने नागालॅंडला या बंदमधून वगळण्यात आले आहे.
या विधेयकामुळे नागरिकांच्या सार्वभौमत्वाला बाधा येणार असून त्यांची जीवनशैली आणि प्रादेशिक ओळख पुसण्याचा प्रयत्न या विधेयकामुळे होत असल्याचा आरोप करत मणीपूरमध्ये राजकीय पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे. कॉंग्रेस, एआययुडीएफ, आसू, कृषक मुक्ती संग्राम समिती, ऑल अरुणाचल प्रदेश स्टुडंटस् युनियन आणि नागा स्टुडंटस् फेडरेशन यांनी बंदला पाठींबा जाहीर केला आहे.