जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात मोठा आर्थिक फटका
रामदास सांगळे
बेल्हे- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या नवे संकट कोसळले आहे. उसाला लागलेल्या तुऱ्यामुळे शेतीचे नुकसान झाल्याच चित्र दिसत आहे. उसाच्या वजनात घट होऊन ऊसाचा गोडवा कमी झाला आहे.
या वर्षीच्या बदलत्या हवामानामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हे संकट आलं असल्याचं शेतकरी सांगत आहेत. दाट धुके, ढगाळ हवामान, अवकाळी पावसाचा फटका उसाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. या उसाच्या तुऱ्यांमुळे शेतकऱ्यांबरोबर साखर कारखानदारीलाही आर्थिक फटका बसत आहे. यावर्षी अवेळी व सतत पडणाऱ्या पावसामुळे उसाला तुरा येण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतामध्ये बराच काळ पाणी साचून राहिल्याने किंवा जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्याने उसाला मोठ्या प्रमाणात तुरा आला आहे, त्यामुळे उसाच्या वजनात 25 ते 30 टक्के घट होत आहे. उसाला तुरा आल्यानंतर उस एक महिन्याच्या आत कारखान्यांनी गाळप केले नाही तर वजनात जास्त प्रमाणात घट येत नाही; परंतु जसजसे गाळपासाठी दिवस जास्त जातील तशी घट मोठ्या प्रमाणात येत असते.
जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात जवळपास एकूण उसाच्या 50 टक्के उसाला तुरे आले आहेत. याचे गाळप लवकर होणे शक्य नसल्याने याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना नगदी पिकांना मोठ्या प्रमाणात फवारणीचा खर्च वाढलेला आहे. त्यातच हुकमी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून ऊस पिकाकडे पाहिले जाते; परंतु त्याच्यावर आलेल्या या पुढच्या संकटाने शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल झालेला दिसून येत आहे.
- यावर्षी उसाच्या पिकाला 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात तुरे आले आहेत, त्यामुळे उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणावर घट येत आहे. या उसाचे कारखान्याने प्राधान्याने गाळप करावे, तसेच कृषी विभागाने तुरे आलेल्या उसाचे पंचनामे करून आलेल्या घटीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.
– मनोहर पटाडे, ऊस उत्पादक शेतकरी, साळवाडी