मुंबई – सप्टेंबर 15 पर्यंत प्रत्यक्ष कर विभागाने 31 लाख करदात्यांना 1.06 लाख कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे.
वैयक्तिक करदात्यांना 31 हजार कोटी, कंपनी करदात्यांना 74 हजार कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. करसंकलन आणि परताव्याची पद्धत जास्तीत जास्त पारदर्शक करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कर परतावा बाकी राहणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, 15 सप्टेंबरपर्यंत आगाऊ कर भरण्यासह एकूण कर संकल्पनांमध्ये 22.5 टक्के घट झाली आहे. या कालावधीत मुंबई विभागात 2,53,532 कोटी रुपयांचे करसंकलन झाले आहे. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. गेल्या वर्षी 15 सप्टेंबरपर्यंत 3,27,320 कोटी रुपयांचे करसंकलन झाले होते. जूनअखेरपर्यंत मुंबई विभागात लॉकडाऊनमुळे करसंकलन 31 टक्क्यांनी कमी झाले होते. या काळात आगाऊ कर भरणा 76 टक्क्यांनी कमी झाला होता.
देशातील इतर बऱ्याच केंद्रातही करसंकलन कमी झाले आहे. त्यातल्या त्यात मुंबईतील करसंकलनावर सर्वांत जास्त परिणाम झाला असल्याचे दिसून आले. कारण सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईमध्ये संसर्गाची संख्या वाढू नये याकरिता कठोर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा शहरातील घडामोडीवरील परिणाम अजूनही संपलेला नाही. माहिती तंत्रज्ञान कंपन्या जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या बंगळुरू केंद्रात मात्र प्रत्यक्ष करसंकलन काही प्रमाणात वाढले आहे.