मुंबई – कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, क्वाटंम कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी या तंत्रज्ञानाला चालना देण्यात येत असल्याचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.
आजादी का डिजिटल महोत्सव या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, त्यासाठी डिजिटल अर्थव्यवस्था विकसित होण्यासाठी आम्ही जागतिक पातळीवर या क्षेत्राचे जसे कायदे आहेत तसे कायदे तयार करणार आहोत. भारतातील लोकांना इंटरनेट आणि तत्सम तंत्रज्ञान पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
भारत सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सर्व सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध होण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम तयार करण्यात येत आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातही डिजिटल अर्थव्यवस्था विकसित होण्यास मदत होईल. भारत सरकारच्या बऱ्याच सेवा सध्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत. या डिजिटल सेवा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. खेड्यात यासंदर्भात वातावरण निर्मिती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
एकच लॉग इन
सध्या भारतामध्ये विविध डिजिटल सेवा घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लाग इन करावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्याऐवजी एकच लॉग ईन केल्यानंतर सर्व व्हर्चुअल सेवा उपलब्ध होण्याची गरज आहे. त्या दृष्टीकोनातून केंद्र सरकार खासगी क्षेत्राच्या मदतीने प्रयत्न करीत आहे. असे झाले तर नागरिकांची गैरसोय आणि वेळ वाचेल असे ते म्हणाले.
डिजिटल अर्थव्यवस्था विकसित होताना सायबर सेक्युरिटीची तितकीच आवश्यकता आहे. गेल्या तीन वर्षात या क्षेत्रात बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. सायबर सिक्युरीटीमध्ये भारत सध्या दहाव्या क्रमांकावर आहे. असे असले तरी यामध्ये सुधारणा करण्यास आणखी बराच वाव असल्याचे त्यांनी सांगितले.