जामखेड: तालुक्यातील दुष्काळी समस्या अनेक असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याबाबत निवेदन दिले आहे. त्या गंभीर स्वरूपाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या जामखेड येथील धावत्या भेटीदरम्यान दिली.
सोमवारी (दि.13) जामखेडहून आपल्या नियोजित मराठवाडाच्या दुष्काळी दौऱ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जात असताना, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर थांबले होते. तेथे जामखेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्यातर्फे त्यांना दुष्काळग्रस्त तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, याबाबत निवेदन देण्यात आले. त्यावेळी शरद पवार बोलत होते.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा नेते रोहित पवार, बीड लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे, बाळासाहेब आजबे,नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सतिष शिंदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी राऊत, बीडचे महेबूब शेख, प्रदेश सरचिटणीस, राजेंद्र कोठारी, प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, शरद भोरे, सुरेश भोसले, संजय वराट, हनुमंत पाटील, राजेंद्र पवार, शरद शिंदे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, डॉ. कैलास हजारे, अमजद पठाण, नगरसेवक पवन राळेभात, दिंगाबर चव्हाण, अमित जाधव, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष जमिर सय्यद, ऍड. हर्षल डोके, प्रदीप पाटील, नरेंद्र जाधव, उमर कुरेशी, अमोल गिरमे, राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, प्रकाश काळे, प्रा. लक्ष्मण ढेपे, संजय कोठारी, कांतीलाल कोठारी आदी उपस्थित होते.
पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नळाद्वारे नगर परिषदेकडून पाणी पुरवठा 21 दिवसानंतर एक तास होत असल्याने, जनतेला टॅंकरव्दारे पाणी पुरवठा होत आहे. मात्र त्यात दररोज नागरीकांत होणारी भांडणे, त्यामुळेच आठ दिवसांनी शहराला पाणी पुरवठा व्हावा अशी जनतेची मागणी आहे. काही भागात नळाद्वारे गटारीचे पाणीमिश्रित पाणी पुरवठा होत आहे. त्याबाबत जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना वेळोवेळी तक्रारी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. जामखेड शहराला पाणी पुरवठा करणारा भुतवडा तलाव कोरडा पडल्याने त्यातील गाळ काढून त्याची खोली वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी होत आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू केलेले असून, सदर पुरवठ्याचे टेंडर पालकमंत्री राम शिंदे यांच्या संबंधित कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये टेंडरप्रमाणे खेपा न टाकता पाणी खेपा वाढवून पुरवठ्यात मोठा गैरव्यवहार होत आहे.
गावात टॅंकर सुरू असुनही जनतेला पुरेसे पाणी मिळत नाही. मात्र बारामती ऍग्रोचेवतीने कर्जत जामखेड तालुक्यात सुमारे 80 टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरू असुन, जनतेला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने तालुक्यात 69 ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या असून, त्या सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मालकीच्या आहेत. छावण्यांवर अपुरा व निष्कृष्ट चारा पुरविण्यात येत असुन, शासकीय नियमाप्रमाणे चारा पुरवठा करण्यात येत नाही. सत्ताधारी पक्षांच्या चारा छावण्या असल्याने आधिकारीवर्ग त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तालुक्यातील रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू नसल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी दुष्काळी परिस्थिती तालुक्यातील समस्या बाबत आपण लक्ष घालून पिण्याच्या पाण्यात होणारा भ्रष्टाचार, चारा छावण्यातील भ्रष्टाचार संपवून सर्व जनतेला पुरेसे पाणी, रोजगार व जनावरांच्या चारा छावण्यात उत्कृष्ट चारा शासनाच्या नियमानुसार मिळेल यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली आहे.