कामगार कायद्यातील बदलांविरोधात रणशिंग फुंकले : मेधा पाटकर
पुणे : लॉकडाऊनच्या काळात राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वयाअभावीच स्थलांतरितांची समस्या निर्माण झाली. या गरीब स्थलांतरितांच्या अन्न पाण्याची सोय केंद्र सरकारने केली नाही, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला.
स्थलांतरितांच्या समस्यांबाबत पाटकर पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, केंद्र सरकारने या स्थलांतरितांकडे पूर्ण दूर्लक्ष केले. मात्र राज्यातील ऊध्दव ठाकरे सरकारने त्यांच्यासाठी बससेवा सुरू केली. त्यामुळे स्थलांतरितांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी काहीशी मदत झाली.
केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्यायअभावी स्थलांतरीतांची समस्या निर्माण झाली असावी असे मला वाटते. आता सरकारने स्थलांतरीतांसाठी वाहतूक सेवा सुरु केली आहे.
स्थलांतरीतांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, त्यांच्या स्थानिक गावी त्यांना मोफत भोजन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. देशातील गरीब आणि गरजुंना दहा हजार रुपयांची मदत करावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या.
करोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार कायद्यात बदल करण्याचा घाट घातला जात आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलन सुरू केले आहे. हे बदल रद्द करावेत अशी मागणी त्यांनी केली. हे बदल कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आणि अमनावी असल्याचा आरोप त्यांनी केला.