हैदराबाद. (तेलंगण) – तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षाच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त हैदराबादेत झालेल्या मेळाव्यात राव यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे. राष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि विधायक राजकारण करण्याची गरज ओळखून आपण हा निर्णय घेतला असल्याचे राव यांनी सांगितले.
शिक्षण, इमिग्रेशन. आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती या क्षात्रांमध्ये अपेक्षित बदल घडवून आणणे हे “टीआरएस’चे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. याशिवायधार्मिक असहिष्णुतेविरोधात लढा, राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण आणि देशाच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे रक्षण करण्याचेही टीआरएसने ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढत्या धार्मिक असहिष्णुतेमुळे देश सर्वच आघाड्यांवर कमकुवत होईल. काही राजकीय गटांच्या राक्षसी कृतींच्याविरोधात जनतेने सामुहिकपणे लढा देण्याबरोबर प्रेम आणि शांततेचा संदेश सर्वत्र परवण्याची गरज आहे. तसेच महागाईवर नियंत्रण आणण्याची मागणीही “टीआरएस’ने केली आहे. वाढत्या दरवाढीबाबत केंद्राच्या अलिप्तता धोरणाला पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
सर्व स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे, असा प्रस्ताव केंद्राकडे विचारार्थ पाठवण्यात आला आहे. “टीआरएस’ने यापूर्वीच महिलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू केले आहे. याबरोबर मागास जाती कल्याण मंत्रालय सुरू करण्यात यावे अशी मागणीही “टीआरएस’च्यावतीने करण्यात आली आहे.