नवी दिल्ली : ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स म्हणजेच टीआरपी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार पार्थ दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. पण हा जामीन मंजूर करतेवेळी न्यायालयाने दासगुप्ता यांना परवानगीशिवाय मुंबई सोडून जाण्यास मनाई केली आहे.
मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळ्यात बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप पोलिसांनी आरोपपत्रातून केला होता. या प्रकरणी दासगुप्ता यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने पार्थ दासगुप्ता यांना दोन लाखांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला. दासगुप्ता यांना परवानगीशिवाय मुंबई सोडून कुठेही जाता येणार नसल्याचे आदेश न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिले. त्याचबरोबर दासगुप्ता यांना स्वतःचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सहा महिन्याच्या काळात दासगुप्ता यांना प्रत्येक महिन्याला गुन्हे शाखेकडे हजेरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पार्थ दासगुप्ता टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पार्थ यांनी एआरजी आउटलायर कंपनीचे संचालक आणि रिपब्लिक वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासोबत संगनमताने कट रचून टीआरपी घोटाळा केल्याचा आरोप गुन्हे शाखेने न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात केलेला आहे. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.