अती तिथे माती म्हणतात हेच खरे. याची प्रचिती बीसीसीआयलाही आता आली असेल. कारण ज्या स्पर्धेच्या लोकप्रियतेचे दाखले जगभरात दिले जात होते त्याच स्पर्धेचा टीआरपी इतका घसरला आहे की, ही स्पर्धा 99 देशांत सर्वात जास्त पाहिली जात होती तीच ही स्पर्धा आहे का, असा प्रश्न पडावा.
दोन दशकांपूर्वी भारतीय संघ मर्यादित क्रिकेट खेळत होता. त्यानंतर सामन्यांची तसेच मालिकांची संख्याही वाढली तरीही परिस्थिती चांगलीच होती. त्यातच 2008 साली आयपीएल सुरू झाली व या स्पर्धेने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक मोडले. पण तरीही आपण एका मोसमात जास्तीत जास्त 8 कसोटी, 30 ते 35 एकदिवसीय सामने व 10 ते 12 टी-20 सामने खेळत होतो.
आयपीएल स्पर्धेत 60-70 सामने होऊ लागले व सर्व समीकरणेच बदलली. त्यातच बीसीसीआयकडे प्रचंड पैसा आला व जागतिक क्रिकेटवर तसेच आयसीसीवर बीसीसीआयची सत्ता निर्माण झाली. मात्र, या नफेखोरीच्या नादात आपला संघ इतके क्रिकेट खेळू लागला की आता चाहत्यांनाही त्याचा कंटाळा येऊ लागला आहे.
खेळाडू तर काय घाण्याचे बैल झाले आहेत. यंदाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर लागोपाठ मालिका खेळल्या जात आहेत. त्यातच आयपीएल आहेच, त्यानंतर इंग्लंड, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका दौरे आहेतच त्यानंतर ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा आहे. खेळाडूंना यंत्र बनवण्यात आले आहे तर बीसीसीआय हा पैसा छापण्याचा कारखाना झाला आहे.
मात्र, आता क्रिकेटमध्ये कधी नव्हे ती मंदी दिसू लागली आहे व या कारखान्यापासून वर्षानुवर्षे जोडले गेलेले ग्राहक दुरावत चालले आहेत. आयपीएल स्पर्धेची लोकप्रियता कमी होऊ लागली ही धोक्याची घंटा आहे व बीसीसीआयला अती क्रिकेटचाच फटका बसत आहे हे निश्चित.