नवी दिल्ली – पश्चिम बंगाल मधील निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यातील कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यामुळे निवडणूक आचार संहितेचा भंग झाला आहे अशी तक्रार तृणमुल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. 28 मार्चला तृणमुलने पत्राद्वारे ही तक्रार केली असून हे पत्र त्या पक्षाने आज प्रसिद्धीसाठी दिले आहे.
या पत्रात पक्षाने म्हटले आहे की अधिकृत कारणासाठी मोदींनी बांगला देशचा दौरा करण्यास आमचा आक्षेप नव्हता. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्याच्या सुवर्ण महोत्सवासाठी ते तिकडे गेले होते. तथापि या दोैऱ्यात 27 मार्च रोजी त्यांनी तेथे जे कार्यक्रम ठेवले होते त्याचा सुवर्ण महोत्सवाशी काही एक संबंध नव्हता.
केवळ पश्चिम बंगाल निवडणुकीवर प्रभाव टाकण्याच्या इराद्यानेच या कार्यक्रमांची आखणी केली गेली होती असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विदेशी भूमितून देशातील निवडणूक प्रचार करण्याचा हा अभुतपुर्व प्रकार होता. असा गंभीर प्रकार आजवर देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केलेला नाही असेही तृणमुल कॉंग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पश्चिम बंगाल मधील भाजपचे खासदार शांतनु ठाकूर यांना मोदी आपल्या बांगला दौऱ्यावर घेऊन गेले होते. वास्तविक त्यांना तेथे नेण्याचेही काही कारण नव्हते असेही तृणमुल कॉंग्रेसचे म्हणणे आहे.