कोलकता -पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने दोन खासदारांना अपात्र ठरवण्याचा आग्रह कायम ठेवला आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला समिती स्थापन करणार आहेत.
तृणमूलच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेलेल्या शिशिर अधिकारी आणि सुनील मंडल या खासदारांनी बंगाल विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षबदल करताना त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यासाठी तृणमूल प्रयत्नशील आहे.
अधिकारी आणि मंडल यांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी दोन पत्रं तृणमूलचे लोकसभेतील नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी बिर्ला यांना याआधी पाठवली. त्यानंतर चालू महिन्याच्या प्रारंभी आणि सोमवारी पुन्हा बंडोपाध्याय यांनी बिर्ला यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.
आता अपात्रतेच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी समिती स्थापण्याची ग्वाही बिर्ला यांनी दिली आहे. अधिकारी हे तृणमूलला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुवेंदू अधिकारी यांचे वडील आहेत. एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सुवेंदू यांच्यावर भाजपने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.