कोलकाता – केंद्र सरकारने पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीची महिती घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना 14 डिसेंबर रोजी दिल्लीत पाचारण केले आहे. त्या आदेशावर तृणमूल कॉंग्रेसने सडकून टीका केली आहे.
केंद्र सरकारचा हा निर्णय घटनाबाह्य आहे असा आरोप त्यांनी केला आहे. तृणमूलचे नेते सौगत राय आणि कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, नढ्ढा यांच्यात मोटारीच्या ताफ्यात अट्टल गुन्हेगार होते व ते सशस्त्र होते. ते वेगळ्या हेतूनेच राज्यात आले होते.
या संबंधात केंद्राने राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीत पाचारण करणे आम्हाला मान्य नाही. राज्याच्या राजकारणात केंद्राने चालवलेला हा हस्तक्षेप असून तो संघराज्य चौकटीत बसत नाही. त्यांना कोणत्या ना कोणत्याही कारणास्तव राज्यात हस्तक्षेप करायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.