कोलकाता – पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणूकांनंतर तृणमूल कॉंग्रेस बरोबर आघाडी करण्याचा पर्याय खुला असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिर चौधरी यांनी म्हटले आहे. देशातील धर्मनिरपेक्ष आघाडी आणि तृणमूल कॉंग्रेसची निवडणूक पश्चात आघाडी करण्याचा पर्याय अद्याप बंद केलेला नसल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.
जर ममता बॅनर्जी यांना बहुमतासाठी जागा कमी पडल्या तर कॉंग्रेस मदत करणार का, असे विचारल्यावर हा भविष्यातील प्रश्न आहे, असे उत्तर चौधरी यांनी दिले. संयुक्त मोर्चाला स्वतःच्या बळावर ही निवडणूक जिंकायची आहे. राजकारण ही शक्यतेची कला आहे.
संयुक्त मोर्चाला निवडणूकीनंतर कोण पाठिंबा देईल, हेही आपल्याला माहिती नसल्याचे चौधरी म्हणाले. जर ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. तर त्या पायउतार होतील. त्या संयुक्त मोर्चाला पाठिंबा देऊ शकतात किंवा संयुक्त मोर्चाकडून पाठिंब्याची अपेक्षाही करू शकतात, असेही चौधरी म्हणाले.