आगरतळा – त्रिपुराच्या खोवाई जिल्ह्यात तृणमूल कॉंग्रेसच्या 12 कार्यकर्त्यांना पोलिसांनी कोविड प्रतिबंधांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून अटक केली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यात तृणमुल कॉंग्रेसचे जे कार्यकर्ते जखमी झाले होते त्यांचाही अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
या घटनेचे वृत्त कळताच तृणमुल कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी खोवाई जिल्ह्याकडे धाव घेतली आहे. तेथे गेलेल्या नेत्यांमध्ये तृणमुलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अन्य तीन प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
तृणमुल कॉंग्रेसचे प्रवक्ते अशिष लाल यांनी सांगितले की पोलिसांनी आमच्यावर बेकायदेशीर कारवाई करून आम्हाला अटक केली आहे. आमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर धलाई जिल्ह्यात अम्बासा येथे हल्ला करण्यात आला होता त्यात आमच्या पक्षाचे सुदिप राहा, जया दत्ता हे पदाधिकारी जखमी झाले आहेत त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे असे त्यांचे म्हणणे आहे.