प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी
मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालयावर किसानसभेच्या वतीने मंगळवारी (दि. 28) मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व डॉ. अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजू घोडे, देविका बोकटे आणि गणेश कातळे यांनी केले.
घोडेगाव येथील हरिश्चंद्र मंदिरापासून किसानसभेने आयोजित केलेल्या मोर्चाचा सुरुवात झाली. प्रशासनाने विविध मागण्या सोडविण्याबाबत उदासिनता दाखविल्याने प्रशासनाच्या विरोधात मोर्चाकरांनी घोषणा दिल्या.
वनविभागाने सुरु केलेली जंगलाला कंपाउंडची कामे याबाबत स्थानिक गाव पातळीवर वनहक्क कायद्याअंतर्गत स्थापन झालेली समिती व ग्रामसभा यांच्याशी चर्चा व विनिमय करुन जो निर्णय होईल. तो वनविभागाने मान्य करावा. आदिवासी भागात रॉकेल नियमित मिळावे. ते बंद करु नये. पावतीवर जितकी रक्कम आहे.
तितकीच रॉकेल दुकानदाराने घ्यावी. हाताला काम द्या. रोजगार हमीची कामे सुरु करणे. प्रत्येक गावाला सामूहिक वनहक्क मिळाला पाहिजे. निराधार पेन्शन योजना शासनाने मान्य केल्यानुसार 1000 रुपयांप्रमाणे देणे सूरु करावे. सरकारी योजनांचे लाभार्थी ग्रामसभेत पेसा कायद्यानुसार ठरवले पाहिजेत. 108 ची रुग्णवाहिका तळेघर येथे पूर्ववत व्हावी व तिरपाड येथे नवीन रुग्णवाहिका मंजूर व्हावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात एक तरी निवासी डॉक्टर असावेत. अतिउपसा क्षेत्रात ज्या गावांची नोंद आहे. त्यांची शहानिशा करुन त्या गावांची नावे रद्द करा इत्यादी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.