महाराजांसारखी दाढी वाढवून ट्रेंडिंग होता येतं. मात्र महाराजांचे
स्त्री संरक्षणाचे विचार ट्रेंडिंग कधी होणार? ज्या दिवशी होतील
तेव्हा कोपर्डी, निर्भया अन् हिंगणघाट बंद होतील…
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तरुणाई नवनवीन मेसेजेस देत नव्या संकल्पना विकसित करून यूट्यूब व्हिडीओ, पोस्टर्स, आंदोलने करतात. तान्हाजी, स्वराज्यरक्षक संभाजी, फत्तेशिकस्त यांसारख्या मालिकांनी प्रेरित होऊन किल्ल्यांचे गिर्यारोहण करून इतिहासाचे महत्त्व जाणून घेत आहेत. मात्र दुसरीकडे माथेफिरू अहंकारी पुरुषांचा एक वर्ग रोजच्या बातम्यांतून पुढे येत आहे. या सगळ्यात कुठे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलेले महिलांचा सन्मान करणारे स्वराज्य?
स्वराज्याची पहिली पायरी ही महिलांच्या आदराची आणि मुलाबाळांच्या सुरक्षेची येते. त्यांना समाजात समान स्थान मिळण्यासाठी आणि संधी देण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न आपण लहानपणापासून वाचत आणि ऐकत आलो. आपल्या मनगटातील बळाचा सन्मान करत महाराजांनी सदैव स्त्री आदरासाठी पुढाकार घेतला. जिजामाता ह्या शिवबांच्या पहिल्या गुरू असल्यामुळे त्यांच्या शिकवणीतून स्त्री सन्मानाचे बाळकडू त्यांना जन्मतःच मिळत गेले.
या तुलनेत मात्र आताच्या माता भगिनी आपल्या बळांना वाढवताना हा आदर आणि सन्मानाचे संस्कार करण्यात कमीपणा समजतात की काय माहित नाही. पण या चिखलाच्या गोळ्याची वाढ होत असताना त्याच्यात महाराजांच्या विचारांचे बाळकडू पाजायला आणि मुरवायला विसरायला नको. नाहीतर भारत महासत्ता तर बनेल मात्र महिलांचे आयुष्य ही कायम मालमत्ता म्हणून बघितली जाईल. प्रत्येक कुटुंबाने महाराजांचा आणि माता जिजाऊचा आदर्श समोर ठेवून घरातल्या शिवबाला समाजातील प्रत्येक जिजाऊचा आदर आणि घरातल्या प्रत्येक जिजाऊला समाजातील शिवबाचा आदर करायला शिकवायला हवे.
मुगलांच्या काळात महाराजांनी स्त्रियांसाठी केलेले नियम, सुधारणा आणि वेळोवेळी घेतलेले कठोर निर्णय हे स्वराज्याचा आरसा होते. या योद्ध्याच्या काळात कधीही स्त्रीचा अनादर झाला नाही. उलट स्त्रियांची खरेदी विक्री, त्यांचे दास्यत्व, त्यांची विटंबना, ही क्रूर वागणूक महाराजांनी कठोर शासन करून बंद केली. महाराजांचे स्त्रीविषयक धोरण हे आताच्या पिढीने आचरणात आणावी अशी संपत्ती आहे. या संपत्तीने आताच्या माथेफिरू पुरुषांची वासना आणि क्रूरता नष्ट होईल.
महाराजांच्या काळातील शिक्षा आता अशक्य असतीलही पण महिलांवरील विटंबनेच्या गुन्ह्यांचा निकाल वेळेवर नको लागायला? महाराजांच्या रूपाने त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करून प्रत्येक महिलेला सुरक्षित करण्याचा पवित्रा घ्यायला हवा. महाराजांसारखी दाढी वाढवून, माथी टिळा लावून, त्यांच्यासारखी केशरचना करून तुम्ही बाह्यांगाने ट्रेंडिंग आयुष्य जगाल परंतु या शिवजयंती निमित्ताने यावेळी अंतरातम्यातून महाराजांचे विचार ट्रेण्डिंगमध्ये आणूया. यातून नवा सुरक्षित भारत साकार करूया.
– पूजा ढेरिंगे