छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मिती करताना निर्माण केलेले आणि अधिक मजबूत केलेले किल्ले जतन करायचे सोडून राज्य सरकार या किल्ल्यांवर पयटकांचा उपद्रव वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, असे सांगत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दुर्गप्रेमींनी राजगडावरील रोप वे ला विरोध करण्याचे ठरवले आहे.
यासंदर्भात दुर्गप्रेमींनी आपली भूमिका समाज माध्यमांत मांडण्यास सुरुवात केली असून त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे. याबाबत सातारा येथील विख्यात ट्रेकर सचिन वाघ यांनी दिलेली माहिती अशी…
सध्या पर्यावरण मंत्रालयाने दुर्गराज राजगड साठी रोप-वे प्रकल्पाचे नियोजन केलेले आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल किंवा काही जणांना नसेलही, परंतु दुर्गराज राजगड हा त्याच्या एकमेवाद्वितीय वैशिष्ट्यपूर्ण बांधकामासाठी आणि दुर्गमतेसाठी प्रसिद्ध आहे. छ.शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील सर्वात जास्त महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आणि महाराजांचे सगळ्यात जास्त काळ सान्निध्य लाभलेले असे हे अनमोल दुर्गरत्न, आजही गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून ओळखले जाते. आणि असा हा गडांचा राजा अनुभवायचा असेल तर गड पायी चढून जाऊन संपूर्ण गडाचा अभ्यास केला तरच लक्षात येईल.
मुळात दुर्गराज राजगडच काय, पण महाराजांचे सर्वच किल्ले दुर्लक्षित अवस्थेत असल्याने त्याचे संवर्धन आणि विकास करणे सध्याच्या काळात नक्कीच आवश्यक आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून आपापल्या परीने हे कार्य विविध गडांवर सुरु आहे. परंतु नुकतेच महाविकास आघाडी सरकारने (पर्यावरण मंत्रालयाने) विकासाच्या नावाखाली दुर्गराज राजगड साठी रोप-वे चा प्रस्ताव मंजूर करून कंत्राट दिलेले आहे.
मुळात कोणत्याही गड-किल्ल्यांचा विकास किंवा संवर्धन म्हणजे रोप-वे करून येणाऱ्या-जाणाऱ्यांची सोय केली की, झाले का ?? तर याचे उत्तर नाही असेच आहे. ज्या ज्या गड-किल्ल्यांना वरपर्यंत गाडीरस्ता किंवा रोप-वे ची सोय आहे, त्यांची सध्याची अवस्था आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहे. प्रतापगड, सिंहगड, दुर्गदुर्गेश्वर रायगड ही ठिकाणे म्हणजे महाराजांच्या पवित्र, पराक्रमी आणि जाज्ज्वल्य इतिहासाची साक्ष देणारी ठिकाणे आज कचरा, थिल्लरपणा, धिंगाणा घालणाऱ्यांची, प्रेमी-युगुलांची आगार बनली आहेत. इतिहास अनुभवण्यासाठी येणाऱ्या खऱ्या दुर्गप्रेमींना हा सगळा प्रकार पाहून त्याचा त्रास होतो आहे.
गड-किल्ल्यांचा खरा विकास आणि संवर्धन करायचे असेल तर गडावर येणारे राजमार्ग, पायवाटा, चोरवाटा यांचे संवर्धन व्हावे, पडके बुरुज-तटबंदी पुन्हा बांधली जावी, प्रवेशद्वारे बसवली जावीत, गडावरून दिसणाऱ्या इतर ठिकाणांची माहिती देणारे सचित्र फलक त्या-त्या ठिकाणी बसविण्यात यावेत. थोडक्यात सांगायचे तर छ.शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक गडाचे जे वैभवशाली रूप होते ते जास्तीत-जास्त रित्या सध्याच्या तसेच येणाऱ्या पिढीला कळेल असे पुनर्बांधणी करून जतन करावे. त्यासाठी निधी, परवानग्या, कंत्राट इत्यादी करावे हि अपेक्षा सरकारकडून आहे. असे असताना रोप-वे सारखे प्रकार करून काय साध्य होणार आहे?
समजा रोप-वे ज्या उद्देशाने केला जातोय तो उद्देश समजून घ्यायला हवा. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे रोप-वे ची सोय केल्यास वृद्ध माणसे आणि लहान मुले यांची सोय होईल. पण वर्षाकाठी असे किती हौशी वृद्ध आवर्जून गड-किल्ले पाहायला येतात? ज्यांनी उभ्या आयुष्यात कधी गड चढला नाही ते आत्ता गडावर जाऊन काय पाहणार आहेत? जे खरोखर हौशी आणि उत्साही असतात त्यांचे वय कधीही आड येत नाही. मध्यंतरीच्या काळात 80 वर्षाच्या आज्जीने तोरणा, किंवा हरिहर किल्ला चढल्याचं सर्वांच्या ऐकिवात असेलच. आणि लहान मुलाचं म्हणाल, तर त्यांची गड-किल्ले चढण्याची क्षमता आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असते. मग उगाच त्यांना ऐतखाऊ का बनवायचं?
तरीही, फक्त दुर्गराज राजगड पुरताच विचार केला तर गडाचा आकार आणि रचना लक्षात घेता रोप-वे चा उपयोग किल्ला पाहण्यासाठी होणारच नाही. दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्याला मोठे विस्तृत पठार लाभले आहे, त्यामानाने दुर्गराज राजगड चार भागांमध्ये विभागला गेलेला आहे. उंचच उंच असा बालेकिल्ला, संजीवनी माची, सुवेळा माची आणि पद्मावती माची हे किल्ल्याचे चार प्रमुख भाग अशा काही रचनेचे आहेत, की कोणत्याही भागातून दुसऱ्या भागाकडे सहजपणे तुम्ही जाऊच शकत नाही.
त्यातूनही रोप-वे चे अप्पर स्टेशन केले तर त्यासाठी पद्मावती माची किंवा थेट बालेकिल्ला याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. दोन्ही ठिकाणावरून संपूर्ण किल्ला फिरून पाहणे आणि पुन्हा रोप-वे स्टेशन जवळ येणे ऐतखाऊ पर्यटकांना शक्य होणार आहे का? हौशी पर्यटकांना इतिहासाशी काहीही देणे-घेणे नसते. अशा लोकांकडून गडाचे, गडाच्या पावित्र्याचे आणि इतिहासाचे फक्त आणि फक्त नुकसानच होते. त्यामुळे ही जी अनमोल दुर्गरत्ने आहेत ती तटबंदी-बुरुज डागडुजी करून संवर्धन करा पण रोप-वे सारखा प्रकल्प आणून त्याचे विद्रुपीकरण करू नका.
दुर्गराज राजगड साठी रोप-वे न करता त्याऐवजी गुंजवणे, पाली, वाजेघर इत्यादी गावातून येणाऱ्या राजमार्ग, पायवाटा, चोरवाटा साफसफाई करून गडावर येण्यायोग्य कराव्या. तसेच बालेकिल्ल्यावरील राहता वाडा, आणि आईसाहेब जिजाबाई यांचा पद्मावती माचीवरील वाडा पुनर्बांधणी करून जतन करावा. पाली दरवाजा, अळू दरवाजा, सुवेळा-संजीवनी माची बुरुज व चिलखती तटबंदी तसेच त्यामधील अनेक दरवाजे यांची साफसफाई, दुरुस्ती करून संवर्धन करण्यात यावे.
गडावर येणाऱ्या वाटा व्यवस्थित केल्यास पायथ्याच्या गावांमधील स्थानिकांना रोजगारासाठी गडावर ये-जा करणे सोपे होईल. यामध्ये इच्छुक वयोवृद्ध लोकांसाठी डोली चा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देता येईल. दुर्गप्रेमी, शिवप्रेमी, अभ्यासक मंडळी यांचेसाठी गडावर पायी येणे आणि गडाचा अभ्यास करणे, गड अनुभवणे हेच मूळ उद्देश आहे त्यांना रोप-वे ची गरज नाही. त्यामुळे इतर गोष्टींचा या लोकांना त्रास होणार नाही याची व्यवस्था लावणे हे पण करता येईल. रोप-वे ने येणारे हुल्लडबाज आणि त्यांच्यामुळे गडाचे होणारे नुकसान आपोआप टाळले जाईल.