कुरवली- इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागासाठी वरदान ठरलेल्या बीकेबीएन (बारामती – कळंब – बावडा – नीरा-नृसिंहपूर) रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमणत वृक्षतोड सुरू आहे.
या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याने या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे या रस्त्यालगत तावशी (ता. इंदापूर) पासून वृक्षतोड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये बाभूळ, चिंच, करंज आदी झांडाचा समावेश आहे. तावशी पासून सुरु झालेली वृक्षतोड कळंब पर्यंत पूर्ण झाली आहे. या भागातील वृक्षतोड सध्या जोरात सुरू आहे. वृक्षतोड झाल्यानंतर झाडांचा उरलेला पालापाचोळा, काटेरी लहान फांद्या इतर राडारोडा रस्त्यालगत टाकण्यात येत आहे. त्यामुळे रहदारी करणाऱ्या वाहनांना याचा नाहक त्रास होत आहे.
रस्त्यालगतची वृक्षतोड करत असताना तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या दुप्पट अथवा तिप्पट वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. परंतु वृक्षतोड करण्याची मंजुरी कागदावरती आली आणि तातडीने वृक्षतोड सुरू झाली परंतु जे जुने वृक्ष आहेत अशा वृक्षांना बगल देऊन त्यांचे जतन केले जावे. तसेच गावातील व गावकुसाबाहेरील जुने सावली देणारे वृक्ष जतन करण्यात यावेत, अशी देखील मागणी परिरातील नागरिकांमधून होत आहे.
- तोडीप्रमाणे लागवड होणार का?-
वृक्षतोड करण्यासाठी मंजुरी आल्यानंतर तातडीने वृक्षतोड सुरू झाली. त्याच पट्टीत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वृक्ष लागवड एवढ्या जोमात केली जाणार का? वृक्षतोड करण्यात आलेल्या वृक्षांच्या नोंदीप्रमाणे दुप्पट अथवा तिप्पट वृक्ष लागवड होणार का? वृक्ष लागवड झालेल्या वृक्षांची निगा राखण्याची जबाबदारी कोण घेणार? याबाबत पर्यावरणप्रेमींनी प्रश्न उपस्थित केला आहे.