-पाटबंधारे विभागाकडून कालव्याशेजारी झाडांवर कुऱ्हाड
-वृक्ष प्रेमींमधून संताप व्यक्त
-लवकरच जनआंदोलन उभारणार
वाई – वाई-पाचगणी रस्त्यावर बाजूलाच असणाऱ्या परंतु वाई नगर पालिकेच्या हद्दीत असणाऱ्या झाडांवर पाटबंधारे खात्याने कसलीही तमा न बाळगता कुऱ्हाड फिरविली आहे. कालव्याच्या शेजारी असणाऱ्या झाडांची कोणाचीही परवानगी न घेताच कत्तल केली आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात असताना शासन वृक्षारोपणावर करोडो रुपये खर्च करीत असताना आम्ही त्या गावचेच नाही असे मानून बेसुमार वृक्ष तोडीचा प्रकार घडल्याने पर्यावरण प्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे.
मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोणाचीही परवानगी न घेता सुस्थितीत असणाऱ्या झाडांची इंधनासाठी कत्तल करणे हे पर्यावरणासाठी घातक बाब आहे, अशा प्रकारची वृक्षतोड अनेक वेळा या विभागाकडून करण्यात येते. कालव्याच्या दुरुस्तीसाठी सर्वात आधी शेजारीच असणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड फिरविली जाते. परंतु या विभागाकडून एकाही झाड लावण्यात येत नाही. नैसर्गिक आलेल्या झाडांचे संगोपनसुध्दा हा विभाग प्रामाणिकपणे करीत नाही ही दुर्दैवाची बाब आहे, असे म्हणावे लागेल.
कोणताही विभाग प्रामाणिकपणे वृक्षतोडी संदर्भात निर्णय घेताना दिसत नाही. तरी पालिका प्रशासनाने त्वरित संबंधित विभागावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. वाई तालुक्यात बेसुमार वृक्षतोडीचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. सुधारणेच्या नावाखाली जवळपास 25 वर्षे जुनी ब्रिटिशकालीन वडाची झाडे वाई-सुरूर रस्त्यावर तोडण्यात येणार आहेत. सोशल मिडीयावरून आवाज उठविल्याने हे प्रकरण थंड आहे. परंतु सुधारणेच्या नावाखाली बांधकाम विभागाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येते. झाडांच्या बुंध्याला आग लावण्यात येते अशा घटना वारंवार घडत आहेत. तरी वनविभागाने कोणाचीही तमा न बाळगता कारवाई करून या प्रकाराला आळा घालावा अशीही मागणी करण्यात येत आहे.
वास्तविक पालिका हद्दीत मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी या प्रांताधिकारी, या तहसीलदार यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. वृक्षतोडीचे कोणत्याही विभागाला काहीही देणेघेणे नाही. ग्रामीण भागात काही शेतकरी कोणाचीही परवानगी न घेता बिनधास्तपणे ब्रिटिशकालीन झाडे तोडण्याचे धाडस करीत आहेत. बांधकाम विभागाच्या हद्दीतील झाडे शेतीला अडचण होत आहे असे कारण पुढे करीत राजरोसपणे वनसंपदा नष्ट करीत असेल तर पर्यावरण संरक्षणासाठी प्रबोधनाची आज नितांत गरज असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. अशी परिस्थिती सर्वत्र पहावयास मिळत असल्याने तहसीलदार, बांधकाम विभागासह, वनविभाग वाई तालुक्यात वृक्ष संरक्षणासाठी बेसुमार वृक्षतोड करणाऱ्यांवर काय कारवाई करणार हाही प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित करण्यात आहे.