महापालिकेकडून सरसकट वृक्षतोडीला दिली जातेय परवानगी
पुणे – महापालिका प्रशासनाकडून वृक्षतोडीसाठी देण्यात येणाऱ्या परवानगीबाबत वृक्षप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून सरसकट वृक्षतोडीला परवानगी दिली जाते. शहरात वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, योग्य दबाव गटाच्या अभावामुळे वृक्षतोड रोखण्यास पर्यावरणप्रेमी अपयशी ठरत आहे. शहरातील वृक्षतोड रोखण्यासाठी सक्षम दबाव गटाची आवश्यकता असल्याचे मत वृक्षप्रेमींनी व्यक्त केले.
एकीकडे वृक्षलागवडसाठी विविध उपक्रम राबविणारी महापालिका वृक्षसंवर्धनाबाबत फारशी जागरूकता असल्याचे दिसत नाही. महापालिकेची वृक्षसंवर्धन समिती ही केवळ परवानगी देणारी समिती बनत आहे. वृक्षसंवर्धनाबाबत या समितीकडून प्रत्यक्षात फारसे कार्य केले जात नाही. त्यामुळेच शहरात वृक्षतोडीचे प्रमाण वाढत आहे. इतकेच नव्हे तर वृक्षतोडीची परवानगी देताना, पुनर्लागवडीची अट असते. मात्र, आतापर्यंत करण्यात आलेल्या वृक्षतोडीनंतर किती झाडांची पुनर्लागवड झाली. तसेच, या झाडांचे जिवंतपणाचे प्रमाण किती? याबाबत माहितीदेखील महापालिका प्रशासनाकडून दिली जात नसल्याची टीका शहरातील वृक्षप्रेमींकडून करण्यात आली आहे.
वृक्षतोडीला परवानगी देताना, त्याचा सविस्तर अभ्यास होत नसल्याचे नेहमी दिसून येते. मात्र, महापालिका प्रशासनाला वृक्षतोडीपासून परावृत्त करण्यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत, दबाव गट निर्माण करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. त्यामुळेच शहरात वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी एकत्र येऊन दबाव गट निर्माण केला पाहिजे.
– आश्विनी भट, वृक्षप्रेमी